एकोणीसशे सत्यांऐंशी साल आणखीही एका अर्थाने वेगळे होते. दत्तमंदिराच्या स्थापनेसाठी 'श्री' कवठ्याला आले होते. दोन दिवस राहण्याचा मानस होता, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे फक्त चार तास राहून श्री परतले होते. श्रींचे शरीरस्वास्थ्य साथ देत नव्हते. यानंतरच्या काळात 'श्री' एकदा नानांना म्हणाले होते, आता इथून पुढे पादुकांचेमार्फत तुम्हाला आदेश मिळतील. आदेश कसे ग्रहण करावेत हे देखील श्रींनी सांगितले होते.त्यावेळी त्याचा स्पष्ट अर्थ कळला नव्हता. पण आपले इहलोकीचे कार्य संपत आले आहे हेच जणू श्री सूचित करीत होते.
सहा डिसेंबर,रात्रीचे पाऊणे नऊचे दरम्यान श्रींनी आपले अवतारकार्य समाप्त करून आपल्या निजस्थानी प्रस्थान केले. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, तेव्हा तेव्हा धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी मी अवतरीत होईन हे भगवंताचे आश्वासन. धर्माची पुनर्स्थापना करून, अखिल जगताला अग्निहोत्राचा मार्ग दाखवून हा परमात्मा आपल्या निजस्थानी गेला. दीडशेहून जास्त देशात श्रींचे कार्य विस्तारले होते.या सर्व भक्तजनांचा आधार आज सगुणरूपातून निर्गुणात गेला होता.आता यापुढे त्यांचे सगुण रूपातील दर्शन नाही.आता आमचे दर्शन हे विशुद्ध यज्ञातील धगधगत्या ज्योती स्वरूपात करायचे हे श्रींचे आश्वासन. त्यासाठी नित्य अग्निहोत्राचे आचरण ठेवून त्यांचे सायंप्रातर दर्शन घ्यायचे.
आज इतक्या वर्षांनी सुद्धा श्रींच्या आठवणीने आपला कंठ दाटून येतो, डोळ्यात अश्रू येतात तर प्रत्यक्ष त्यावेळी नानांचे दुःख केवढे मोठे असेल! नानांच्या दृष्टीने त्यांच्या आयुष्यातील सारी नाती ज्या चरणांशी होती ते चरण सगुणरूपांनी पुन्हा कधीच दिसणार नव्हते. ज्या श्रींनी नानांना बोट धरून चंद्रसूर्याच्याही वरचे आपले स्थान दाखविले होते, ते श्री आता नानांचे बोट सोडून एकटेच आपल्या अनंतातील त्या स्थानावर निघून गेले होते. ही वेळच अशी होती की सारा अध्यात्मविचार बाजूला पडला होता व नानांचे मन आक्रंदुन म्हणत होते.
श्री गुरुमाये तवचरणांचा
आश्रय सकला होता
तुजविण कोण जगी त्राता || धृ||
काही रुचेना काही सूचेना
जळते जीवन क्रूर यातना
रुसला का हो प्रभो जगावर
सोडूनिया जाता ||१||
धावूनी आलो तव भेटीसी
करपे काळीज सांगू कुणासी
पूर्ण कृपेचा हात शिरावर
कोण धरी आता ||२||
बांध भंगले जीवन सरले
जलेवीण जव मीन तळमळे
व्यथा मनाची सांगू कुणाला
शमवी कोण आता ||३||
'श्री' देहाने दूर गेले पण त्यांची कृपा व त्यांच्या सहवासातील आठवणी नानांच्या मनात दाटून येत होत्या. नानांनी केलेली सेवा श्रींना खूप पसंत असायची. पूर्णावताराच्या त्या परमपवित्र देहाची नानांना सेवा करायला मिळत होती. एकदा अशीच चरणसेवा करतांना नानांच्या लक्षात आले की श्रींच्या उजव्या पायाच्या अंगठ्याजवळचा मांसलभाग पाय चेपतांना दाबला गेला की श्रींच्या पायाला काहीतरी सलते आहे, पाय झटकला जात आहे. नानांनी खात्री करून घेण्यासाठी श्रींना विचारले, या जागेला काही झाले आहे का? वेदना पचविल्याच्या आवाजात त्यावर श्री म्हणाले, हो तेच तर वर्म आहे. तिथेच बाण लागला होता. कृष्णावतारी त्याच जागी बाण लागून प्रभुंचा देहोत्सर्ग झाला होता.नानांना त्याची साक्ष दिली गेली होती.
आपल्या स्वरूपाची साक्ष श्रींनी नानांना वेळोवेळी दिली होती. कर्दळीवनातील वारुळात असतांना स्वामी समर्थांच्या मांडीवर लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव बसला होता.उजव्या मांडीवर जेथे कुऱ्हाडीचा घाव बसला तेथे स्वामींच्या मांडीवर नृसिंहाचे मुख तयार झाले होते.तीच जन्मखुण उजव्या मांडीवर घेऊन श्रींचा अवतार झाला होता. जेव्हा जेव्हा श्री खुशीत असायचे तेव्हा तेव्हा तो कुऱ्हाडीचा घाव श्रींनी नानांना दाखविला आहे. आणि त्या खुणेकडे अंगुलीनिर्देश करून श्री प्रसन्नपणे म्हणाले आहेत, पहा! आम्ही कोण आहोत पहा! श्रींनी नानांना किती अद्भुत अनुभूती दिल्या होत्या. एकोणीसशे त्र्याऐंशी सालचा गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न झाला होता. श्रींच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी दाराबाहेर एक फकीर उभा होता. दाढी,जटा,भगवी लुंगी, कुडता.चष्मा लावला होता. कृषकाय असा हा फकीर परंतु त्याच्या नजरेत एक वेगळीच चमक होती. बाहेरूनच तो श्रींकडे एकटक पाहत होता. बराच वेळ त्याला त्या अवस्थेत बघितल्यावर नानांना वाटले त्याची चौकशी करावी.नानांनी बाहेर येऊन त्या फकीराला विचारले, आप कहा से आये है? फकीर म्हणाला, हम श्रीशैल्य से आये है| ये पारा की गणेशमूर्ती श्रीजी को अर्पण करनी है| नानांनी सर्व वृत्तांत श्रींना सांगून त्या फकिराला आत आणू का विचारले. श्री त्यांना घेऊन या म्हणाले. नानांनी बाहेर येऊन फकीराला म्हटले, चला आपणाला आत बोलाविले आहे. फकीराच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. तो आत आला. श्रींच्या हाती पाऱ्याची गणेशमूर्ती देऊन त्यांने श्रींना वंदन केले. दोघांची नजरानजर झाली आणि फकीर बाहेर जायला निघाला. एवढ्यात श्रींनी नानांना त्यांची काही अपेक्षा आहे का असे विचारा म्हणून सांगितले. पण त्या मिनिटभरात तो फकीर कुठेतरी नाहीसा झाला होता.सर्वत्र शोधूनही नानांना तो सापडला नाही. नानांनी श्रींना असे सांगितल्यावर श्री हसून म्हणाले बरं, बरं! दर्शनाची गर्दी संपल्यावर श्रींनी नानांना बोलावून घेऊन सांगितले की सकाळी पाऱ्याचा गणपती देण्यासाठी फकीरवेशाने श्रीशैल्याहून भगवान महादेव स्वतः इथे आले होते.पारा आळवण्याची रससिद्धी फक्त भगवान महादेवांना अवगत आहे.या निमित्ताने आपल्याला श्रीशैल्यनाथांचे दर्शन झाले आहे. नुसतेच दर्शन नाही तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलला आहात. असाच एक प्रसंग आहे.गुरुमंदिरात नानांची कीर्तने चालू होती. त्याचवेळी तेथे स्वामीनामाची वीणादेखील सुरू होती. त्याला अनुसरून नानांनी कीर्तनात 'हरे राम हरे राम राम राम हरे हरे' या मंत्राऐवजी 'श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ' हा मंत्र सांगितला. दुसरे दिवशी श्रींचा नानांना निरोप आला. नाना त्यांचे समोर उपस्थित झाले. श्रींनी नानांना विचारले काल कीर्तनात मधले नामस्मरण का बदलले? 'हरे राम हरे राम राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे' या नामाचा आणि काणेबुवांचा अतूट संबंध आहे. हरे राम म्हणजे काणेबुवा आणि काणेबुवा म्हणजे हरे राम हे समीकरण आहे,यात बदल होता कामा नये. अशाच एका कीर्तनानंतर उशीर झाला, श्रोत्यांची जाण्याची गडबड होती म्हणून कीर्तनानंतरची आरती, 'आरती दत्तात्रयप्रभूंची करू श्रीपादवल्लभांची' याचे एक कडवे म्हणून नाना थांबले. तर दुसऱ्या दिवशी सकाळीच श्रींनी त्यांना बोलावून सांगितले, समोर श्रोते असो अथवा नसोत,आम्ही तर आहोत ना? इतरांशी काय कर्तव्य आहे? त्या दिवसापासून कितीही उशीर झाला असला तरी कीर्तनानंतर नाना पूर्ण आरती म्हणू लागले.
कीर्तनाच्या वेळेच्या संदर्भात श्रींनी नानांना केलेला उपदेश सर्वांनी साररूपाने लक्षात घेण्याची गरज आहे.श्रींनी नानांना सांगितले की नेहमी कीर्तनाची बोर्डावर जाहीर केलेली वेळ पाळत जा. कारण त्या वेळेला त्या मंदिरातील अथवा त्या जागेतील अधिष्ठान बोर्डावरील वेळेनुसार उपस्थित असते. तुम्ही वेळ पाळली नाही तर ते अधिष्ठान निघून जाते व कीर्तन रंगत नाही. नानांनी हा श्रींचा उपदेश कायमच कटाक्षाने पाळला. अगदीच जर काही अपवादात्मक कारणं असतील तर नाना त्या अधिष्ठात्या देवतेला प्रणाम करून थांबण्याची विनंती करीत.श्रींनी आयुष्यातील वेळेचे महत्त्व यातून अधोरेखित केले आहे. आपण वेळ पाळत नाही व आयुष्याचे अधिष्ठान निघून जाते मग आयुष्यात रंग कसा येणार ? असो.
नानांनी श्रींच्या या आज्ञेचे काटेकोरपणे पालन केले. कोणतेही कीर्तन वेळेवरच सुरू करण्याचा त्यांचा कटाक्ष असे.कधीही साथीदारांना यायला उशीर होतोय किंवा ध्वनीक्षेपण यंत्रणावाला आला नाहीये म्हणून नानांनी कीर्तन उशिरा चालू केले असे झाले नाही. स्वतः हार्मोनियम वाजवीत ते कीर्तनाला सुरुवात करीत. शक्य आहे की काही जणांना यात नानांचा हेकटपणा वाटला असेल,स्वतःकडे मोठेपणा घेण्यासाठी दुसऱ्यांना जाणून बुजून कमी लेखलेले वाटले असेल,आयोजकांना एवढेसुद्धा सहकार्य करीत नाहीत असेही वाटले असेल. प्रत्येकजण आपापल्या चष्म्यातून पाहणार. पण यातील गुरुआज्ञेचे पालन ज्याला कळले आणि आचरावेसे वाटले तो धन्य. असे अनेक लोकपवाद त्यांच्या वाट्याला आले. अमुक प्रसंगात बुवा असे कसे वागले होते असे लोकोपवाद आजही आहेत, पण अशा लोकोपवादांना प्रत्युत्तर देण्यापेक्षा ते शांत, अविचल राहिले. आणि माझ्या दृष्टीने तर आपले असामान्यत्व झाकून घेण्यासाठी जाणीवपूर्वक काही लोकोपवाद नानांनी धारण केले होते. असेच एकदा गुरुमंदिरात असताना नानांनी श्रींना विचारले, आज कीर्तन करण्याचे मनात आहे, आपली परवानगी आहे का? संध्याकाळी कीर्तन करू का? त्यावर 'श्री' नानांना म्हणाले, आपण हा प्रश्न आम्हाला विचारायचाच नाही. आपल्या मनात येईल तेव्हा आपण कीर्तन करावे, त्याला वेळ काळाचे बंधन नाही. या गुरुमंदिरातील सेवा काणेबुवांना आम्ही निरंतरासाठी दिलेली आहे. तसेच त्यांना आमचे दर्शन चौवीसतास खुले आहे. त्यांच्या मनात येईल तेव्हा ते आमच्या दर्शनास येऊ शकतात. त्यांना कोणीही अडवणार नाही, अडवू शकणार नाही. श्रींच्या या वचनाचा प्रत्यय नानांना एकदा आला. एकदा प्राणलालजींनी निव्वळ थट्टा म्हणून नानांना श्रींच्या खोलीच्या दरवाजात अडवून सांगितले, बुवा आत जायचे नाही. नाना मागे फिरले. तितक्यात त्वरेंने श्रींनी प्राणलालजींना हाक मारली, अरे ए प्राणलाल, तुला काणेबुवा म्हणजे काय खेळणे वाटले काय?
एकोणीसशे त्र्याऐंशीसाली मार्गशीर्ष महिन्यात सोनामातांचा टाळ सुरू होऊन साठ वर्षे झाली. त्यानिमित्त गुरुमंदिरात सात दिवस मोठा कार्यक्रम होता.नाना कार्यक्रमासाठी पोहोचले. श्रींना वंदन करण्यासाठी जाताना श्रींच्या खोलीतील संवाद त्यांच्या कानी पडला. कोणीतरी श्रींना विचारीत होते, या उत्सवात काणेबुवांना कोणते काम द्यायचे? त्यावर श्री म्हणाले, त्यांना तसं कोणी काम द्यायची वा सांगायची गरज नाही. काणेबुवा इथे यावेळी उपस्थित असणे हाच महोत्सव आहे.
नानांना हा मोठेपणा फुकाफुकी मिळाला नव्हता. श्रींनी वेळोवेळी घेतलेल्या परीक्षांमधून तावून-सुलाखून नाना कसाला उतरले होते. ब्याऐंशीत्र्याऐंशीच्या दरम्यानची गोष्ट आहे. भोजन व्यवस्थेसाठी श्रद्धावान मनुष्य मिळत नाही म्हणून श्री अन्नत्याग करणार होते. त्यावेळी नाना आपला प्रेमाचा अधिकार दाखवून श्रींना म्हणाले, माझी ह्या गोष्टीला परवानगी नाही. ज्यावेळी असा प्रश्न उभा राहील तेव्हा मला कळवावे,मी सेवेला हजर राहीन. त्यानंतर जवळजवळ वर्षभर श्रींनी नानांची परीक्षा बघितली. एखादा उत्सव ठरविला आहे आणि नाना कीर्तनासाठी जायला निघणार आहेत, एवढ्यात श्रींचा सेवेला यायचा निरोप यायचा व नाना त्याचक्षणी उत्सवाची वेगळी व्यवस्था करून श्रींच्या सेवेत रुजू व्हायचे. त्यांनी कधीही व्यावहारिक उत्पन्नाचा किंवा ठरविलेले कीर्तन सोडल्यामुळे मिळणाऱ्या वाईटपणाचा विचार वा फिकीर केली नाही. या वर्षभराच्या काळात सहा सात उत्सव नानांनी सोडले पण सेवा चुकविली नाही की दिला शब्द खाली पडू दिला नाही. अशी परीक्षा झाल्यावर श्रीजी एके दिवशी सरदेशमुखांना म्हणाले, आमच्या सेवेसाठी काणेबुवा केव्हाही येऊ शकतात याची आम्हाला खात्री झाली आहे. पण कार्यकर्ता माणूस आहे, कीर्तनातून अग्निहोत्र प्रचार करतात, तेव्हा आमच्यासाठी चार पोळ्या भाजायला, आमचे कौपीन धुऊन टाकायला असा कार्यकर्ता अडवून ठेवणे आम्हाला प्रशस्त वाटत नाही.
बुवांच्या कीर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट होते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष होते. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प होता . या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली व श्रींनी सुरुवातीचा कालखंड जेथे व्यतीत केला ती राजीम, रायपुर तसेच अमरकंटक हि क्षेत्रे, बिलासपुर, नागपूर, कवठे गुलंद ते अक्कलकोट या बुवांच्या पायी वारीतील अनेक ठिकाणी व भारतभर सर्व प्रमुख पवित्र स्थानांवर बुवांनी संकल्प कीर्तने केली.