गणेशवाडी,जिल्हा कोल्हापूर या गावात श्री गणेशांचे एक स्वयंभू जागृत असे देवस्थान आहे. श्री गणपतीच्या पूजेसाठीच कोकणातल्या केसपुरी गावातून काणेघराणे गणेश वाडीला आले. या घराण्यात हरिभक्त परायण चिमणाजी महाराज हे कीर्तनकार झाले. गुरुगृही दत्तभक्तीचं वातावरण असल्यामुळे त्यांनाही दत्तभक्ती रुचली आणि पचली होती. चिमणाजींनी एक व्रत स्वीकारले होते, कुठेही प्रवासाला जाताना व प्रवास संपवून घरी येताना न चुकता श्रीक्षेत्र नरसोबावाडीत जावे, दक्षिण द्वारी किर्तन सेवा करावी, प्रभूंचा प्रसाद घ्यावा व मगच घरी यावे. याशिवाय घरी मुक्कामी असताना कधी एकादशी, कधी पौर्णिमा आली तर त्याही दिवशी वाडीत जावे कीर्तन सेवा करावी हा नियम चिमणाजींनी आयुष्यभर एक व्रत म्हणून अखंड चालविला होता. जेव्हा उतारवय झाले, शरीर क्षीण होऊ लागले तसं जाणवू लागलं की आता आपल्याकडून प्रवास होणार नाही. तरी आता नरसोबावाडीला जाऊन अखेरची एक कीर्तन सेवा प्रभू चरणी अर्पण करावी, प्रभूंचा प्रसाद घ्यावा, आशीर्वाद घ्यावा, निरोप घ्यावा व आपल्या घरी हरी म्हणत स्वस्थ रहावे. या संकल्पाने चिमणाजी वाडीला आले दक्षिणद्वारी किर्तन सेवा सुरू झाली.
आज चिमणाजींचे मन भारावलेले होते. नमन झाले,पूर्वरंग संपला. कीर्तनाचा उत्तर रंग सुरू व्हायचा होता. कीर्तनाला रंगदेवतेची साथ लाभलेली होती.पण चिमणाजींना एक व्यथा टोचत होती, आजचे अखेरचे कीर्तन.वियोगाच्या कल्पनेने चिमणाजींचा कंठ दाटून आला, अश्रू पाझरू लागले.प्रभुंना देखील आपल्या प्रिय भक्ताच्या वियोगाची कल्पना सहन झाली नाही आणि त्यांच्याही नयनातून प्रेमपूर पावसाच्या रुपाने वाहु लागला. या अकस्मात आलेल्या पावसामुळे कीर्तनसेवा थांबवावी लागली. चिमणाजी उदास झाले. आजच प्रभुंनी सेवा का स्वीकारली नाही ? मन खिन्न, उद्विग्न झाले व त्यांनी अन्न त्यागाचा संकल्प केला.त्याच पहाटे या अनुतप्त मनावर अमृताचा वर्षाव झाला. चिमणाजींना स्वप्नदृष्टांत झाला. प्रभुंनी दर्शन दिले आणि म्हणाले,चिमणा, माझ्या सेवेसाठी तुला इथे येण्याची आता गरज नाहीये. मी तुझ्या घरी आहे. तू तिथेच माझी सेवा कर. चिमणाजींचे मन प्रसन्न झाले त्याच आनंदात ते घरी परत आले.
इकडे गणेशवाडीत जोशीबुवा नावाचे एक विरागी, अधिकारी दत्तभक्त संन्यासी होते. त्यांच्याकडे तांब्याची, श्रीपाद श्रीवल्लभांची प्रासादिक अशी मूर्ती होती.ज्या पहाटे चिमणाजींना वाडीत दृष्टांत झाला, त्याच पहाटे जोशीबुवांनाही दृष्टांत झाला.प्रभूंनी त्यांना आज्ञा केली, तुझ्याकडील श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती तू चिमणाजीला नेऊन दे.
चिमणाजी घरी परततात तोच हे जोशीबुवा श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती घेऊन चिमणाजींच्या घरी आले आणि म्हणाले,चिमणाजी,भगवान दत्तप्रभूंनी हा प्रसाद तुझ्यासाठी पाठवला आहे.या रूपाने ते तुझ्याच घरी राहणार आहेत.याचा स्वीकार कर.चिमणाजींचे मन प्रसन्न झाले. कंठ दाटून आला,डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. त्यांनी संन्यासीबुवांकडून मूर्ती हाती घेतली, हृदयाशी घट्ट धरली व ते आनंदाने अक्षरशः नाचू लागले.आयुष्यभर केलेल्या दत्तसेवेचे फळ त्यांना मिळाले होते.त्यांचा भाग्योदय झाला होता. त्यांच्या कुळाचा उद्धार झाला होता. अशा या चिमणाजी महाराजांच्या चरणी आपणही नम्र होऊन त्यांना वंदन करूया.
चिमणाजींच्या पुण्याईचा हा झरा असाच वाहत राहीला. चिमणाजी बुवा नंतर शिवराम बुवा व कृष्णाजी, नंतर हरिकृष्ण व पाचव्या पिढीतील श्रीपादकृष्ण. कीर्तनपरंपरा या पाच पिढ्यातून कायम होती. दत्तप्रभूंचा वरदहस्त या घराण्यावर कायम होता. श्रीपाद व सावित्रीबाईंचा संसार फुलत होता. ईश्वरी संकेत स्पष्ट होत होता. सावित्रीबाईंना दिवस गेले होते. नऊ मासांनी गर्भ वाढत होता. अशातच पौष महिना उजाडला.आज पौष कृष्ण सप्तमी विवेकानंदांची जयंती.पहाटेपासूनच अवघी सृष्टी आनंदली होती.एक अनामिक उत्कंठा वातावरणात भरून राहिली होती. पक्षी मधुर कुजन करून त्या मंगलमय वातावरणात जणू सामगायनच करीत होते.इतक्यात ती उषादेवी पूर्व क्षितिजावर अवतरली. हे उषादेवी तू आज नेहमीपेक्षा लवकर तर आली नाहीस ना? तू आज नेहमीपेक्षा जास्तच प्रसन्न का वाटत आहेस? आज विवेकानंद जयंती म्हणून का?उषादेवीने फक्त स्मितहास्य केले.तेवढ्यात भगवान सहस्त्ररश्मींच्या प्रकटण्याची वेळ झाली. भगवान तुम्ही सुद्धा आज एवढे प्रसन्नपणे का हसताय? विवेकानंदांची जयंती म्हणूनच ना? सूर्यभगवान प्रसन्नपणे म्हणाले, अरे आपल्या विचारांना वेचक,वेधक करून विश्वाला आनंद देण्यासाठी, कलकी अवतारी भगवंतांचा लीला साथी आज अवतरत आहे. केसपुरी ते शिवपुरी हा संकेत आज पुरा होणार आहे.
सूर्योदयाबरोबरच सावित्री माता प्रसूत झाल्या. पुत्ररत्न प्राप्ती झाली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. जो तो एकमेकांना सांगू लागला, पुत्र झाला पुत्र झाला. आपल्या पुत्राच्या मुखाकडे पाहून सावित्रीबाई प्रसन्नपणे म्हणू लागल्या.
बाळ नारायण कलेकलेने वाढत होता. त्याच्यामागे धावताना सावित्री मातेचा दिवस कसाच निघून जात होता. त्याच्या बाललीला सर्वांनाच मोहून टाकत होत्या.पाहता पाहता नारायण मोठा झाला. उपनयन संस्कार झाला. तो शाळेत जाऊ लागला. लहानपणापासूनच नारायणाच्या अलौकिक बुद्धिमत्तेचे, त्याच्यावरील पूर्वजन्मींच्या संस्कारांचे दर्शन घडू लागले.पूजा करतानाचा संकल्प करताना सुद्धा स्वतःसाठी काही न मागता, सर्वेषां कल्याणार्थं, एवढाच संकल्प तो करीत असे. ते रहस्य गुरुभेटीनंतर स्पष्ट व्हायचे होते.
खूप शिकावे काही आगळे वेगळे करावे असे नारायणाला लहानपासूनच वाटायचे. तसा तो अतिशय हुशार होता. पण घरच्या परिस्थितीमुळे त्या हुशारीचे चीज झाले नाही.मराठी पाचवीपर्यंत जन्मगावी, गणेश वाडीला प्रत्येक वर्षी पहिल्या नंबराने पास झालेला हा विद्यार्थी, सहावीला तेथून दोन किलोमीटर वरील शेडशाळ या गावी जाऊ लागला आणि एका अर्थाने त्याचे शालेय जीवन संपले. नुकतीच गांधी हत्या झाली होती. ब्राह्मण समाजाची जाळपोळ झाली होती. खूप कठीण काळ होता तो.शेडशाळ गावच्या शाळेत हजारभर विद्यार्थ्यांमध्ये नाना एकटेच ब्राह्मण विद्यार्थी. खूप काही सहन करावे लागले.खूप हाल झाले. मदतीला कोणीच नव्हते, कोणीच त्राता नव्हता.
पाचवीपर्यंत पहिल्या नंबराने पास होणारे नाना,सहावीत या त्रासाने नापास झाले.सततच्या होणाऱ्या मानसिक, शारीरिक छळाचा हा परिपाक होता. परिस्थितीवश दबलेल्या या मुलाला नापास करणे हेडमास्तरांना बरे वाटेना. त्यांनी नानांना सातवीत घातले. त्रास चालूच होता. सातवीत दोन वर्षे आणि आठवीचे सहा महिने नानांनी कसेबसे काढले. हा साडेतीन वर्षाचा काळ अत्यंत खडतर, अतिशय विषारी असा काळ होता.
शेवटी या परिस्थितीवर मात करण्याचा निर्णय नानांनी स्वतःच घेतला.आणि मोठ्या दुःखाने त्यांनी शाळा सोडली. स्वतःच्या उराशी बाळगलेल्या स्वप्नांचा चक्काचूर होताना असहाय्य होऊन पाहणे, ही परिस्थितीने घेतलेली फार मोठी परीक्षा होती.पण पूर्वजन्मीचे संस्कार एवढे दृढ होते की कधीही कोणाचा सूड घ्यावा,कुणाचा द्वेष करावा, हेवा करावा असे कधीही वाटले नाही. पूर्वजन्मींच्या संस्काराने तयार झालेले मन तेव्हाही सर्वत्र सुखीन:संतु अशी विश्व कल्याणाचीच प्रार्थना करायचे.
बुवांच्या कीर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट होते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष होते. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प होता . या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली व श्रींनी सुरुवातीचा कालखंड जेथे व्यतीत केला ती राजीम, रायपुर तसेच अमरकंटक हि क्षेत्रे, बिलासपुर, नागपूर, कवठे गुलंद ते अक्कलकोट या बुवांच्या पायी वारीतील अनेक ठिकाणी व भारतभर सर्व प्रमुख पवित्र स्थानांवर बुवांनी संकल्प कीर्तने केली.