यावेळी नानांचे वय अवघे चौदा वर्षाचे होते. याचवेळी त्यांनी पाच पिढ्यांच्या घरच्या कीर्तन व्यवसायात लक्ष घालायचे ठरविले.सुरवातीच्या काळात त्या वेळच्या वयानुसार कीर्तनात गाण्यासाठी स्वतः एक पद तयार केले. त्या पदाचे कौतुक तर दूरच, पण आप्तांकडून त्याचा तीव्र उपहासच झाला. या उपहासाच्या शापाने जणू बाल हनुमंताप्रमाणे आपल्या या काव्यशक्तीचे पुढील जवळ जवळ दहा-बारा वर्षे नानांना विस्मरण झाले. यथाकाली राम भेटायचा होता. त्याच्याकडून या शक्तीची जाणीव पुन्हा दिली जायची होती. काळ थोडे थांब असेच सूचित करीत होता. अशा या सर्व कुचंबणेला, त्रासाला कंटाळून नाना गावच्या माळावरील श्रीलक्ष्मीच्या देवळापाशी गेले. पूर्वेला तोंड करून उभे राहिले आणि म्हणाले,देवा, तू कोण आहेस,कुठे आहेस हे मला माहित नाही. तुझे अस्तित्व मान्य करून सांगतो, तुझा भक्त दरिद्री असावा हे मला मान्य नाही. योगक्षेमं वहाम्यहं, हे तुझे ब्रीद तू सांभाळ. मी सेवेत,कष्टात आळस करणार नाही.
नानांनी भगवंताकडे हे मागणे एका वेगळ्या काव्य प्रकारात मागितले. तो आगळा काव्यप्रकार म्हणजे काव्यावली.
भगवंताच्या पायाशी मागणे मागितले होते.आता पाच पिढ्यांची कीर्तन परंपरा पुढे चालू ठेवावी असा विचार होत होता. त्या दृष्टीने अभ्यासाची सुरुवात देखील झाली होती. एक-दोन छोटी आख्याने तयार झाली होती. घरच्याघरी त्याचा प्रयोग केला होता.अशातच अचानक एके दिवशी सज्जनगडावरचे पत्र आले. गडावर परमपूज्य श्रीधर स्वामींच्या नेतृत्वाखाली,कैलासवासी डॉक्टर पटवर्धन राष्ट्रीय कीर्तनकार,यांचे अध्यक्षतेखाली आणि धर्मभास्कर गं. ना.कोपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय कीर्तनकार संमेलन व्हायचे होते. त्याचे निमंत्रण नानांचे काका श्री.हरिकृष्ण काणे यांचे नावे आले होते. ते टपाल नेमके नानांच्या हाती दिले गेले.यामागे वेगळाच ईश्वरी संकेत होता. काका अशा कार्यक्रमांना जात नसत. त्यामुळे त्यांची परवानगी घेऊन नानांनी गडावर कीर्तनाला जायचे निश्चित केले. कीर्तनकार कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या ठिकाणी जाण्यामागचे कारण देखील तेवढेच मोठे होते. ज्या दिवशी हे टपाल नानांच्या हाती मिळाले त्याच दिवशी पहाटे नानांना एक स्वप्न पडले होते. स्वप्नात ते एक ऐतिहासिक नाटक पहात होते. त्यात समर्थ रामदासांचा प्रवेश होता. समर्थांची भव्य मूर्ती मनावर ठसत होती. भव्य छाती, भव्य दाढी जटा ,दिव्य तेज, बलदंड शरीर, खांद्यावर झोळी, पायी खडावा व उजव्या हातात कुबडी. ती कुबडी उंच धरून समर्थांनी गर्जना केली, जय जय रघुवीर समर्थ आणि त्यांच्याबरोबर गर्जना करीतच नाना स्वप्नातून जागे झाले. आणि त्याच सकाळी सज्जनगडावरचे हे पत्र मिळाले.
नाना कीर्तनासाठी गडावर पोहोचले. त्यांचे यथोचित स्वागत झाले. नानांच्या आधी ज्येष्ठ प्रवचनकार व कीर्तनकार श्री. सु. ग. शेवडे यांचे गुजरातीमध्ये कीर्तन झाले. त्यानंतर नानांचे कीर्तन झाले. चांगले पाऊण तास कीर्तन झाले. कीर्तन संपताच आदरणीय श्रीधर स्वामींनी नानांना जवळ बोलावून घेतले.त्यांच्या हाती श्रीफळ दिले. नानांच्या डोक्यावरून व पाठीवरून पुन्हा पुन्हा हात फिरवीत मोठ्या प्रेमाने ते त्रिवार वदले, मोठे व्हाल ! मोठे व्हाल! मोठे व्हाल ! पहिल्या कीर्तनापासूनच जामदग्न्य गोत्राने नानांना कुशीत घेतले आहे.
त्या पहाटे झालेल्या समर्थांच्या दर्शनामध्येसुद्धा मोठे ईश्वरी संकेत होते. पुढे नानांच्या हातून एक महाकाव्य रचले जाणार होते. समर्थांच्या चारशेव्या जयंती वर्षातच हे काव्य नानांकडून घडले. हे महाकाव्य म्हणजेच समर्थांच्या जीवन चरित्रावरील महाकाव्य, "गीत समर्थायन".
या कीर्तनाच्या वेळेचा एक विलक्षण योगायोग आज मागे वळून पाहताना जाणवतो. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला ते धर्मभास्कर गं. ना. कोपरकर यांनी पुढे अनेक वर्षांनी पुण्याच्या एका जाहीर सभेत नि:संदीग्धपणे सांगितले, की सांप्रत उक्ती आणि कृती एकच आहे, असे एकच कीर्तनकार आज विद्यमान आहेत आणि ते म्हणजे श्री.नारायण बुवा काणे. हा खरोखरीच खूप मोठा सन्मान होता.
पहिल्या कीर्तनानंतर, श्रीधर स्वामींच्या आशीर्वादानंतर आता कोणताच संदेह राहिला नव्हता. घराण्याची कीर्तन परंपरा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायची ही दिशा स्पष्ट झाली होती. कीर्तन कशासाठी, ही वैचारिक बैठक देखील पक्की झाली होती. त्याच वैचारिक बैठकीतून निर्माण झालेले गीत अखिल भारतीय कीर्तनसंस्थेचे घोषगीत ठरले.
किर्तन परंपरा पुढे न्यायचा निश्चय पक्का झाला होता. त्यासाठी संस्कृतचे शिक्षण घेणे गरजेचे होते. संस्कृतच्या शिक्षणासाठी नाना बेळगावजवळच्या चिकोडी येथील श्री. वामनशास्त्री चिंचणीकर यांचेकडे रुजू झाले. परिस्थिती बेतास बात असल्यामुळे नाना वार लावून शिक्षण घेत होते. ज्याच्याकडे वार असेल त्याच्या घरची पडतील ती कामे करावीत व मगच अन्नग्रहण करावे असे ते खडतर दिवस होते. संस्कृतचे शिक्षण झाल्यावर गायनाचे शिक्षण श्री. विनायक बुवा पटवर्धन यांचेकडे झाले. व्यासंग वाढत होता. कीर्तनात रंग भरत होता. लोकांना नानांचे कीर्तन आवडू लागले होते. परिस्थिती अजूनही खडतरच होती. कीर्तनासाठी बाहेर पडल्यावर एखाद्या गावात ओळखीने एखाद्या घरी, देवळात उतरायचे. स्वतःच कीर्तनाची जाहिरात करायची.मिळाले तर मानधन, नाहीतर आरतीत जमेल तो पैसा हेच उत्पन्न. त्या पैशात साथीदारांचा आठ आणे हिस्सा द्यायचा. दर आठवड्याला जमलेल्या पैशातून जिथे असतील तिथून घरी मनी ऑर्डर करायची. बाहेर असताना खर्च वाढायला नको म्हणून ज्वारी किंवा बाजरीचे एकच पीठ घ्यायचे. त्याच्या भाकऱ्या करायच्या व उरलेल्या पिठाचे पिठले करायचे. चवीला मीठ मिरची हेच नानांचे भोजन असायचे. पैसा वाचविण्यासाठी पुढचा मुक्काम जवळचा असल्यास तबला पेटी, स्वतःचे सामान,खांद्यावर घेऊन चालत पुढचे गाव गाठायचे,असे ते कष्टमय दिवस होते. आजच्या जमान्यातील सर्व सुखसोईंमध्ये वाढलेल्यांना नानांनी घेतलेले कष्ट कदाचित खरे सुद्धा वाटणार नाहीत. पण याच खडतर प्रवासातून नाना घडत गेले. वयाची 14 ते 24 ही दहा वर्षे अपार कष्टांची, जगाचे भले बुरे अनुभव घेण्याची गेली.
अशातच एकदा कीर्तनानिमित्त गोव्याजवळील सुपे गावात नाना वडिलांसह कीर्तनासाठी गेले होते. कीर्तनासाठी तेथेच मुक्काम होता. या कीर्तनांना श्री. भास्करराव बापट आपली कन्या आशालता हिच्यासह येत होते. थोड्या परीचयानंतर नानांच्या वडिलांनी नानांच्या लग्नाच्या दृष्टीने भास्कररावांकडे त्यांच्या मुलीची चौकशी केली. प्रथम भेटीतच नानांना आशालता, म्हणजेच आपल्या माई, आवडल्या होत्या. अखेर जन्मजन्मांचे ते नाते होते. वडिलांना ते प्रकटपणे सांगू शकत नव्हते, पण आडमार्गाने त्यांनी आपली पसंती सांगून ठेवली होती. याच मुक्कामात नानांच्या लग्नासंबंधी श्रीपादरावांनी भास्कर रावांकडे विचारणा केली. नानांकडून पसंती होतीच. नंतरच्या काळात माईंचा भाऊ गणेशवाडीला येऊन घराण्याची माहिती घेऊन गेला. पत्रिका दाखविली गेली. गावातील पत्रिका बघणाऱ्यानी नानांना पत्रिका जमत नाहीये, लग्न करू नकोस असा सल्ला दिला. पण नानांनी लग्न करीन तर हिच्याशीच असे ठामपणे सांगितल्यावर तुझ्या मर्जीप्रमाणे कर मी आड येणार नाही असे प्रांजळपणे सांगितले. लग्नाची बैठक ठरली. लग्न घेण्या-देण्यावरून अडणार असे वाटू लागले. नानांच्या वडिलांनी लग्न लावून द्या व वरदक्षिणा म्हणून दीड हजार रुपये द्या असे सांगितले. भास्कररावांना परिस्थितीवश हे शक्य नव्हते. त्यांनी खाजगीत नानांकडे हे स्पष्ट केले.नानांनी त्यांना यावर एक नामी सल्ला दिला.नाना भास्कररावांना म्हणाले की जे काही ठरेल ते मान्य करा.वाटल्यास कर्ज काढा.लग्न लागल्यावर वरदक्षिणेचे पैसे मी तुम्हाला परत करीन. असा हा स्वच्छ मनाचा,आगळावेगळा जावई भास्कररावांना भावला व पंधरा मे एकोणीसशे बासष्ट या दिवशी नाना माईंशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर माईंचे नाव सुमती ठेवण्यात आले. नानांचा मित्र दुग्ध व्यवसायिक श्री. संगप्पा भुशिंगे याने मित्रप्रेमाने मंडपात स्पीकर लावला होता. वरातीच्या टांग्याची व्यवस्था पण त्यानेच केली होती. लग्नानंतर संध्याकाळी वरात निघाली.माईंच्या पायगुणाची मोठी गोष्ट अशी की त्याच दिवशी गणेशवाडी गावात वीज आली. घरे, गाव प्रकाशमान झाले. नव्या सुनेच्या पायगुणाचे कौतुक अवघ्या गावाने केले. माईंच्या पायगुणाने फक्त गावच उजळले असे नव्हे. ईश्वरी संकेत वेगळा होता. याच माईंच्या पायगुणाने नानांच्या आयुष्यात प्रकाश उजळणार होता. याच पावलांच्या पुण्याईने नानांची त्यांचे भाग्यविधाते सद्गुरू, परम सद्गुरु श्री गजानन महाराज यांची भेट झाली. नानांचा संसार माईंनी सुखाचा संसार केला.त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नाना नेहमी म्हणतात,
पत्नी लक्ष्मी आली जीवनात
माझे चित्त हित सांभाळाया ||
रंगलो कीर्तनी पुण्याई तियेची
साऊली मायेची लाभे हे मजं ||
तिच्या पाऊलांनी झाली गुरु भेटी
फळे ही गोमटी अमृताची ||
प्रपंची परमार्थी सुख लाभ झाला
तियेचे नी धाला नारायण ||
बुवांच्या कीर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट होते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष होते. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प होता . या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली व श्रींनी सुरुवातीचा कालखंड जेथे व्यतीत केला ती राजीम, रायपुर तसेच अमरकंटक हि क्षेत्रे, बिलासपुर, नागपूर, कवठे गुलंद ते अक्कलकोट या बुवांच्या पायी वारीतील अनेक ठिकाणी व भारतभर सर्व प्रमुख पवित्र स्थानांवर बुवांनी संकल्प कीर्तने केली.