विवाहानंतर अंगावरची हळदही नीटशी पुसली गेली नव्हती.अशातच नानांना कीर्तनासाठी सोलापूरला जावे लागले. कीर्तने चालू होती. अशावेळी एक मोहपाश अकस्मात पुढे आला.नानांच्या कीर्तनावर खुश असणाऱ्या एका व्यक्तीने नानांपुढे नोकरीचा प्रस्ताव ठेवला.दरमहा पाचशे रुपये पगार आणि राहायला दोन खोल्या. एकोणीसशे बासष्टसाली ही केवढी तरी मोठी सुविधा होती.
मनात विचारांची वादळं चालू झाली. लग्न नुकतेच झालेले होते, त्यामुळे नोकरीतील स्थैर्य,पत्नीचा सहवास की ध्येयाच्या वाटेवरचा खडतर प्रवास, काय करावे?विचार पक्का होईना. मन सैरभैर झाले. अशावेळी वडिलांनी पोक्तपणे सांगितले,पत्नीचा सल्ला घे व दोघांनी काय ते ठरवा. माईंना विचारून काय तो निर्णय करावा या विचाराने नाना गणेश वाडीला आले. घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. नोकरी का कीर्तन यातील एक काहीतरी निवडायचे होते. जणू एका बाजूला सुखी, प्रापंचिक जीवन, व एका बाजूला ध्येयनिष्ठ कठोर तपोचरणाचे खडतर जीवन, यातून एक काय ते निवडायचे होते. अशावेळी माईंनी खंबीरपणे नानांना सांगितले,व्यवसाय कोणता करायचा हा आपला प्रश्न आहे. पण आपण विचारत आहात म्हणून सांगते, मी एका कीर्तनकाराशी विवाह केला आहे. माझा पती कीर्तनकार आहे याचा मला निश्चितच अभिमान आणि आनंदही आहे, तो माझा आनंद संपू नये एवढीच माझी इच्छा आहे.
माईंच्या या स्पष्ट सल्ल्याने नानांच्या मनातील विचारांची आंदोलने शांत झाली. संदेह संपला. कीर्तनकारिता सोडायची नाही हे पक्के झाले. शांत मनाने ते सोलापूरला परतले. नाना म्हणतात, माईंच्या त्या खंबीर सल्ल्यामुळेच मी कीर्तनकार राहिलो. मी कीर्तनकार राहिलो त्यामुळेच माझी माझ्या भाग्यविधात्या सद्गुरूंच्या चरणांची भेट झाली. ईश्वरी योजना स्पष्ट होती.
इकडे सोलापूर जवळील अक्कलकोट या स्वामी समर्थांच्या पुण्यवान नगरीतील श्री गुरु मंदिर, बाळाप्पा महाराज मठ. विसाव्या शतकातील बुद्धीवादी जगाला विज्ञानाच्या आधारे धर्म सांगून अखिल मानवाला सत्प्रवृत्त करण्याच्या संकल्पनेने हा मठ उभा होता. खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव घडवून आणणारी एक महान शक्ती तिथे होती. श्रुती प्रतिपादित सत्यधर्म अवघ्या विश्वापुढे आणण्याची प्रतिज्ञा या शक्तीने केली होती. त्यासाठी कटिबद्धपणे कठोर अनुष्ठान चालू होते. या शक्तीचे नाव, परम सद्गुरु श्री गजानन महाराज शिवपुरी अक्कलकोट.यापुढे आपण त्यांचा उल्लेख ईश्वरवाचक श्री या शब्दाने करणार आहोत.
त्यांच्याच आदेशाने मठाचे कुलमुखत्यार कै. श्री. बाबुरावजी खैराटकर सोलापूरला आले. सोलापूरला कोणी कीर्तनकार आले असतील तर त्यांना गुरुपौर्णिमा उत्सवात सेवेसाठी घेऊन या असे श्रींनी बाबुरावांना सांगितले होते. योगायोगाने त्यांची नानांशी भेट झाली. योगायोग कसला! ती श्रींचीच योजना होती.
नानांचे वडील आणि नाना अक्कलकोटला पोहोचले. गुरु मंदिरात पोहोचल्यापासूनच नानांचे अंतर्मन साक्ष देऊ लागले की तू तुझ्याच घरी आला आहेस. अत्यंत प्रसन्न आणि पवित्र असे मठाचे वातावरण आपली सारी प्रसन्नता तेथील प्रत्येक वस्तूतून प्रक्षेपित करीत होते.श्रीजी विश्रांतीसाठी माडीवर गेले होते.नाना सभा मंडपात पोहोचले. अवघी श्रद्धास्थाने व शक्य तेवढा मठ त्यांनी पाहून घेतला. दुपारी चार वाजता श्रींचे दर्शन व्हायचे होते. श्रींच्या दर्शनाची ओढ लागून राहिली होती. केव्हा एकदा चार वाजता आहेत असे नानांना झाले होते.
ठीक चार वाजता श्रींचा निरोप आला. तात्काळ वडिलांसह नानांनी श्रींच्या खोलीत प्रवेश केला आणि समोर पाहिले तो काय! सागराचे गांभीर्य, आकाशाची विशालता, विश्वाचे सौंदर्य,भक्तीचा सुगंध, कोटी सूर्याचे तेज,रजनीनाथाची शितलता, देवादिकांचे सुकृत, श्रुतींचे सार आणि परम सुखद परब्रम्हाचा आनंद साकार होऊन विसावला होता. इवल्याशा कुडीचा आश्रय घेऊन जणू ती चितशक्ती ब्रम्हांडाचा वेध घेत इथे स्थिर झाली होती. केतकीलाही लाजवेल अशी तरलकाया आणि गौरवर्ण,अंगावरच्या स्वच्छ आणि पांढऱ्या शुभ्र वस्त्राशी एकरूप झाला होता. द्वंद्वातीत अवस्था स्पष्ट जाणवत होती. त्रिगुणात्मक असूनही त्रिगुणातीत अवस्था भोगणारा हा महात्मा शांतपणे आपल्या आसनावर विराजमान झाला होता. अर्धोन्मिलित दृष्टिक्षेप जेव्हा नानांवर पडला तेव्हा नानांच्या अंतर्मनातील प्रेम सागरावर समाधानाच्या लाटांवर लाटा नाचू लागल्या.
नकळतच नानांची मान लवली तेव्हा तो अभयदाता हात उंच झाला. गुलाबाच्या पाकळीचा रक्तिमा धारण केलेला तो मृदू हात आशीर्वाद,अभय आणि प्रेम यांचा अमृत वर्षाव नानांवर करीत होता. नजरेतील स्नेह अंतराळात नेत होता.भारावल्या अंतकरणांनी नाना ते लोभस दर्शन घेत होते. एवढ्यात त्या शक्ती मुखातून शब्द बाहेर पडले. श्री म्हणाले, आपला आणि आमचा सव्वाशे वर्षाचा ऋणानुबंध आहे, आणि त्यासाठीच मुद्दाम बोलावून घेतले आहे. चिमणाजी बुवांना दत्तमूर्ती मिळून सव्वाशे वर्षे झाली होती, हा संकेत नानांच्या लक्षात येताच तेच साक्षात दत्तप्रभू आज या रूपाने दर्शन देत आहेत हे लक्षात आले. एवढ्यात नानांच्या वडिलांकडे पाहून श्री म्हणाले, व्यावहारिक अर्थाने नारायण हा तुमचा मुलगा असेल, पण खऱ्या अर्थाने तो आमचा मुलगा आहे, आम्ही त्याचा हात धरला आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. नाना भारावून गेले होते. सात दिवस चाललेल्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवात श्रींचेच होऊन गेले होते. मनाने केव्हाच संकल्प केला होता की, कुडीत प्राण आहे तोवर येथील गुरुपौर्णिमेचा उत्सव चुकवायचा नाही. श्रींचा निरोप घेताना मन कासावीस झाले होते. शरीर अक्कलकोटमधून बाहेर पडले तरी मन अजून तेथेच रेंगाळत होते व प्रसन्नपणे गात होते.
एकोणीसशे साहसष्ट सालचा दत्त जयंती उत्सव होता. सौ. माई आणि आपले प्रथम अपत्य,छोटा भार्गव दादा यांना घेऊन नाना गुरूमंदिरी आले होते. कीर्तन सेवा त्यांच्याकडेच होती.तशातच मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी पासून एकादशीपर्यंत, म्हणजे गीता जयंती पर्यंत, गीतेमध्ये यज्ञ हा शब्द ज्या ज्या ठिकाणी आला आहे त्या त्या ठिकाणी त्याचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे हा विषय 'श्री' नानांना समजावून देत होते. श्री आपल्याला घडवू पाहत आहेत याची जाणीव नानांच्या मनाला होत होती. द्वादशीला सकाळी दहा वाजण्याचा सुमार होता. बोलता बोलता श्री म्हणाले, हीच ती गुरुकिल्ली आहे, आज आम्ही ती तुमच्या हाती दिली आहे.एकोणीसशेबावीस साली मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीलाच श्रींना दिव्याग्नी दर्शन झाले होते.नेमक्या त्याच दिवशी बोलता बोलता श्रींनी नानांना अनुग्रह दिला, गुरुमंत्र दिला. अनपेक्षितपणे झालेल्या अनुग्रहाने नानांना कमालीचे समाधान झाले होते.तो दिवस,तो गुरुमंत्र ,तो अनुग्रह आणि ती गुरुकिल्ली याचं स्मरण आजही ताजेपणांनी नानांजवळ आहे. कधीही न संपणारा ठेवा आणि स्वानंद श्रींनी नानांना दिला होता.
श्रींच्या प्रेमाचा वर्षाव चालुच होता. ध्यानी,मनी,स्वप्नी नानांनाही श्रींचाच ध्यास लागून राहिला होता. अशातच चिमणाजी महाराजांनी गणेशवाडीला सुरू केलेल्या गुरुद्वादशीच्या उत्सवाचा सव्वाशे वर्षाचा उत्सव जवळ आला होता. या उत्सवाला श्रींनी यावे ही नानांच्या अंतरीची इच्छा होती. नानांनी श्रींना त्या संदर्भात विचारल्यावर श्रीसुद्धा तात्काळ येतो म्हणाले. नवमीची रात्र, दशमीचा पूर्ण दिवस राहून एकादशीला श्री परतणार होते. दशमीच्या दिवशी सकाळी नऊ वाजता गुरुपूजनाचा कार्यक्रम ठरला होता. नानांचा आनंद गगनात मावत नव्हता. आज त्यांचे भाग्यविधाते त्यांच्या घरी आले होते. प्रथमच करावयाच्या गुरुपूजनाचा आनंद मनोमंदिरी साठला होता. गेल्या पाच पिढ्या आपल्या घरी चिरस्वरूप वास्तव्य करून असलेली अव्यक्त शक्ती, व्यक्त होऊन सगुणाच्या आधारानी आशीर्वाद देण्यासाठी प्रत्यक्ष घरी आली होती. दोन दिवस श्री घरी राहिले होते. परत जाताना नानांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवीत श्री म्हणाले, आम्ही इथेच आहोत बरे !
श्रींच्या याच प्रेमाची अनिवार नशा नानांना चढली होती. एकोणीसशे अडुसष्टसाली ज्येष्ठ महिन्यात दहा कीर्तने सोलापूरला झाली. त्यावेळी अनपेक्षितपणे नानांना टायफाईड झाला.चौविस दिवस सणकुन ताप आला. पालीसारखे पांढरे पडायला झालं होतं. अशक्तपणा तर कमालीचा होता. दोनच दिवसांनी गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू व्हायचा होता. पण नाना अशक्तपणामुळे कीर्तन करू शकत नव्हते.आई-वडिलांसह नाना अक्कलकोटला पोहोचले. श्रींचे दर्शन घेताना श्री म्हणाले, अरे हे काय ? किती अशक्त झालाय तुम्ही! नाना म्हणाले, यंदा अशक्तपणामुळे मला कीर्तनसेवा जमेल असे वाटत नाही. त्यामुळे वडील कीर्तन करतील व मी पेटीची साथ करीन. हे ऐकून श्री गंभीर झाले, आतल्या आवाजात म्हणाले, बरं बरं काही हरकत नाही, विश्रांती घ्या, हे सांगताना श्रींच्या नेत्रपल्लवावर दवबिंदू तरारले होते.
खंबाटा नामक एका सेवकाला श्रींनी सांगितले, काणेबुवा फारच क्षीण झाले आहेत. त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था माडीवर करा. आईसाहेबांना श्री म्हणाले, काणेबुवांना टॉनिकची गरज आहे. आपल्या गाईचे दूध हे उत्तम टॉनिक आहे. चांगला पेला भरून सकाळ-संध्याकाळ त्यांना दूध प्यायला द्या. त्यावर आईसाहेब म्हणाल्या, आपल्या गाईचे दूध इतकं कमी आहे कि बुवांना दिले तर आपल्याला काय देणार?आपण तर बाहेरचे दूध घेत नाही.श्री म्हणाले, बुवा फारच अशक्त झाले आहेत, त्यांनाच दूध द्या.आम्ही दूध घेतले वा न घेतले सारखेच आहे. बुवा इथे आहेत तोवर फार तर आम्हाला दूध देऊ नका. श्रींचे हे वाक्य ऐकून नानांचे डोळे पाणावले. कधीही खंडित न होणारा हा प्रेमाचा झरा त्यांच्यापुढे वाहत होता आणि त्यांना संजीवनी देत होता. त्या कामधेनुच्या दुधाने आणि श्रींच्या प्रेमाने नाना पुष्ट होत होते.
अशातच एका अद्वितीय यागाचे साक्षी होण्याचे भाग्य नानांना लाभले. शिवपुरी म्हणजे श्रींच्या आपल्या पित्यावरील उत्कट प्रेमाची साक्ष देणारे पवित्र शिवस्थान.एकोणीसशे एकोणसत्तरसाली फाल्गुन मासी या पवित्र क्षेत्री एक अद्वितीय असा अहिंसक सोमयाग झाला. यज्ञीय हिंसा श्रींना पसंत नव्हती.यज्ञीय अहिंसा प्रस्थापित करण्यासाठीच श्रींचा अवतार होता. या सोमयागाच्या निमित्ताने जणू स्वर्गच पृथ्वीवर अवतरला होता. समाप्तीचे दिवशी साक्षात काशीविश्वेश्वर दर्शनासाठी तिथे आले. चिरनिवासासाठी जागा मागून त्यांनी तेथे निवासही केला, याहून या यज्ञाचे फलित काय असू शकेल? या काळात एका झोपडीत श्रींचा निवास होता. त्यासमोर उत्तरेला एक तेवढीच झोपडी होती. तिथे सामूहिक गायत्री पुर:चरण आणि श्रीगुरुचरित्राची पारायणे चालू होती. त्यावर देखरेख करण्याचे काम नानांकडे होते.शिवाय चिदंबर दीक्षित यांच्या पोथीचे पारायण श्रींनी नानांकडून करून घेतले. त्या सात दिवसांमध्ये नित्य भगवान परशुरामांच्या चैतन्य पादुकांचे पूजन करावे, स्वतंत्र भात शिजवून दूध भाताचा नैवेद्य दाखवावा, आणि तोच प्रसाद ग्रहण करावा ही सेवा नानांना मिळाली होती.या काळात अनेक शास्त्री,पंडित,कीर्तनकार,प्रवचनकार सेवेला यायचे. त्या सर्वांना श्री सांगायचे काणेबुवांना भेटून घ्या, तो विभाग त्यांच्याकडे आहे. तेव्हा ही सारी विद्वान मंडळी नानांना शोधत त्यांच्याकडे यायची, व हात जोडून आम्हाला सेवा द्या म्हणून सांगायची. एवढे मोठेपण 'श्री' नानांना देत होते. सोमयोगाच्या स्मृतीसाठी स्थापन केलेल्या सोमेश्वर शिवलिंगाच्या स्थापनेच्या वेळी सुद्धा मुद्दाम निरोप पाठवून श्रींनी नानांना आपल्याजवळ बोलावून घेतले होते.
बुवांच्या कीर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट होते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष होते. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प होता . या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली व श्रींनी सुरुवातीचा कालखंड जेथे व्यतीत केला ती राजीम, रायपुर तसेच अमरकंटक हि क्षेत्रे, बिलासपुर, नागपूर, कवठे गुलंद ते अक्कलकोट या बुवांच्या पायी वारीतील अनेक ठिकाणी व भारतभर सर्व प्रमुख पवित्र स्थानांवर बुवांनी संकल्प कीर्तने केली.