मीती ज्येष्ठ शुद्ध दशमी रविवार सात जून एकोणीसशे सत्यांऐंशी हा मूर्ती स्थापनेचा दिवस ठरला होता. त्याआधी नाना श्रींसोबत श्रीपाद श्रीवल्लभांचे स्थान कुरुगड्डीला जाऊन आले होते. मूर्ती स्थापनेला आता आठच दिवस उरले होते. कवठे गुलंद गावात उत्साहाचे वातावरण पसरू लागले होते. गावच्या लोकांनी सर्व रस्ते झाडून साफ केले. सर्वत्र रांगोळ्या घातल्या गेल्या होत्या. नव्या मंदिरासमोर एक भव्य व सुंदर शामियाना उभा केला होता. ब्रम्हवृंदांचे हस्ते प्रभुचरणी अभिषेक चालू होता. त्यासाठी एकवीस नद्यांचे जल एकत्र आणले होते. अवघा परिसर माणसांनी फुलून गेला होता. अग्निहोत्री, सोमयाजी,वाजपेयी असे श्री.नाना अत्रे उपस्थित झाले होते. श्रीमंत छत्रपती राजमाता सुमित्राराजे भोसले यांचे देखील आगमन झाले होते.श्री. रत्नाप्पा कुंभार, श्री. आप्पासाहेब पाटील हेही उपस्थित होते. उपस्थित सर्व मंडळी श्रींच्या आगमनाची चातकासारखी वाट पाहत होती. सकाळी ठीक पावणेदहाच्या सुमारास नानांच्या भाग्यविधात्याचा पवित्र, पावन, परममंगल असा पदस्पर्श कवठ्याच्या या भूमीला झाला. त्याक्षणी परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त! स्वामी समर्थ महाराज की जय!या घोषणांनी आकाश भरून गेले. ठीक दहा वाजता मूर्तीची स्थापना झाली. पाठोपाठ अग्निमंदिराचे उद्घाटन झाले.मंदिराच्या तळघरात श्रींचे पादुका स्थान आहे, आपल्या पदस्पर्शाने श्रींनी तेही पावन केले.
त्यादिवशी किमान दहा-बारा हजार माणसे भोजन प्रसाद घेऊन गेली. विपुल अन्नदान झाले. श्री अतिशय प्रसन्न होते. त्यांच्या अंगात ताप होता, खोकलाही खूप झाला होता म्हणून फक्त चार तासच राहून श्री निघणार होते. 'श्री' नानांना म्हणाले, हे सारे वातावरण शिवपुरी सारखेच आहे, शिवपुरीचे हे दुसरे टोक आहे.या वाक्याचा तेव्हा बोध झाला नाही,तथापि पुढे सहा डिसेंबरला श्रींनी देह ठेवला तेव्हा लक्षात आले, श्री सूचक बोलले होते. श्रींनी कवठ्यात येऊन नानांवरील प्रेमाचा जणू कळस चढविला होता, नानांना धन्य केले होते.
ती कृतार्थता, ती तृप्ती नानांच्या अभंगातून व्यक्त झाली.
एकोणीसशे सत्याऐंशीसाल हे नानांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. याच वर्षी गुरुभेट होऊन पंचवीस वर्षे झाली. याच वर्षी त्या भाग्यविधात्या सद्गुरूंकडून दीक्षा मिळाल्याला एकवीस वर्षे झाली. याच वर्षी कवठ्याच्या मंदिराची देखील स्थापना झाली. आणि याच वर्षी नाना आणि माईंच्या लग्नाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली. नानांनी आपल्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस कसा साजरा केला असेल? उत्सुकता आहे ना? प्रथेप्रमाणे कीर्तनांसाठी नाना घराबाहेरच होते. लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस यासारख्या गोष्टी आपल्यासारख्या सामान्य जनांना.धेय्यनिष्ठ,कठोर तपाचरणाचे जीवन जगणाऱ्या दैवी दंपतीला याचे काय मोठेसे कौतुक. विवाहाच्या रौप्य महोत्सवानिमित्त नानांनी त्यावेळी माईना एक पत्र मात्र लिहिले होते. हे पत्र त्यांच्या संग्रहात मला एकदा मिळाले. त्या पत्रात नानांनी आपल्या मनातील सारे विचार,सारी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पाहूया तरी हे पत्र काय आहे.
जीवनाच्या प्रवाही एक लाट आली
तुझी माझी भेट अचानक झाली ||
झालो एकरूप धर्माच्या बंधने
मने झाली एक प्रेमाच्या स्पंदने ||
वर्षे झाली त्याला आता पंचवीस
तरी वाटे मना जवळ असावीस ||
जेव्हा जेव्हा आलो जवळी देहानी
मन ग्रस्त झाले मायेच्या मोहानी ||
तोंडे होती दोन आता झाली सहा
कर्तव्यात सुख आता उभे रहा ||
तुझे घर तेथे रानात वनात
इथे व्याकुळ मी माझीया मनात ||
काम क्रोध लोभ आता झाले शांत
आता फक्त हवी मायेची सोबत ||
विरहात सुख पुनर्मिलनाचे
मिलनात दुःख पुनर्वियोगाचे ||
सोसेनाहा आता सुखदुःख खेळ
एक साथ राहू सदा सर्वकाळ ||
ओढ हीच मनी आहे तळमळ
परि श्रेष्ठ आहे नियतीचे बळ ||
एक हंस अन तीन सानुल्या, जन्मा आल्या उदरा,
कुठे तयांचे घरदार, अन कुठे तया निवारा
मायेच्या पंखांची उब, त्यांना किती पुरणार,
पंख फुटता उडून जातील, घरट्यापासून दूर ||
जातील तेथे सुखी असुदेत,इच्छा धरूया उरातही
प्रकाश त्यांना स्पष्ट दिसू दे, अंधाऱ्या रात्रीतही,
कासवीच्या नजरेने पाहू, माया देऊ तशातही,
एकसाथ परी तू मी दोघे,असणे इच्छा मनातही ||
पती-पत्नीतले आदर्श नाते कसे असावे याचा बोध नाना आणि माई यांच्याकडे बघितल्यावर मिळतो. आणि आमच्या माईंबद्दल तर किती सांगू आणि काय सांगू असे होते. लग्नानंतर जेव्हा माईंनी नानांना जे ठामपणे सांगितले होते की,माझे पती कीर्तनकार आहेत हा माझा आनंद अबाधित राहू दे,हे त्यांचे सांगणे तोंडदेखले किंवा भावनेच्या भरातले नव्हते, तर जाणीवपूर्वक त्यांनी स्वीकारलेले एक कठीण व्रत होते हे पुढील आयुष्यात त्यांनी वारंवार आपल्या कृतीने दाखवून दिले. गणेशवाडीतल्या घरातील एकत्र कुटुंबातील संसार. त्यानंतर गणेशवाडीतून बाहेर पडल्यावर वेगवेगळ्या बिऱ्हाडातील संसार माईंनी कोणतीही कुरकुर न करता अतिशय प्रेमाने केला. नानांच्या शब्दात सांगायचे तर लग्नानंतर आम्ही आमची चार आख्याने माईंच्या गळ्यात टाकली व आम्ही प्रवासासाठी व गुरुसेवेसाठी मोकळे झालो. हि चार आख्याने म्हणजे, आमचा भार्गवदादा,हेमाताई ,गीताताई व संध्याताई. या चारही मुलांचे पालनपोषण व संस्कार माईंनी केले. कीर्तनानिमित्त वर्षातल्या तीनशेपासष्ठ दिवसातले दोनअडीचशे दिवस नाना घराबाहेरच असायचे. अशावेळी मातेचे प्रेम व पित्याचा पाठीवरचा आश्वासक हात माईंनीच या मुलांना दिला. श्रींच्या सेवेसाठी म्हणा, कीर्तनांसाठी म्हणा किंवा पदयात्रेसाठी बाहेर पडतांना नानांना कधीच माईंच्या कपाळावर आठी दिसली नाही. पदयात्रेमध्ये जेव्हा लोकोपवाद सुरू झाले तेव्हा माई नानांच्या मागे ठाम उभ्या राहिल्या. तेव्हापासूनच स्वतःच्या शरीरस्वास्थ्याची तमा न बाळगता नानांबरोबर त्यांची देखील पदयात्रा चालू झाली. आज आपण जेव्हा कवठ्याला येतो तेव्हा इथे मंदिराजवळ रहदारी, वस्ती दिसते. पण तीस वर्षांपूर्वीच्या या एकाकी अशा माळावर स्वतःसह चार लहान मुलांना घेऊन राहणे ही साधी गोष्ट नव्हती. आजूबाजूला मैलभर अंतरात तरी शेजार नव्हता.पण माईंची श्रीं वरील श्रद्धा व निष्ठा एवढी मोठी होती की अक्षरशः,' निवडले प्रभुने स्थान, रम्य उद्यान, तेच मज झाले' या काव्यपंक्तीप्रमाणे माईंनी हा सारा परिसर आपलासा केला. येथील माळावर वेगवेगळ्या भजनमंडळांच्या माध्यमातून त्यांनी भक्तिमार्ग येथील स्त्रियांमध्ये रुजविला. आजही त्यांनी चालू केलेली भजनमंडळे मोठ्या उत्साहाने कार्यरत आहेत.
माईंकडे पाहिल्यावर जाणवते ती त्यांची कर्तव्यकठोरता व तेवढाच प्रेमळपणा.आणि याच जोडीला कोणताही प्रसंग हसून साजरा करण्याची त्यांची वृत्ती. आजही वयाची पंच्चात्तरी गाठतांना अनेक आजार त्या हसूनखेळून सहन करीत आहेत. स्वभावातला गोडवा रक्तात उतरला,आयुष्यभर ताठपणाने परिस्थितीशी झगडलेला कणा आता थकला, पदयात्रेतसुद्धा कधीही कुरकुर न करणारे गुडघे आता दुखू लागले, पण या कोणत्याही आजाराने त्यांच्या मनाची प्रसन्नता कधीही कमी झाली नाही. माईंना बरे नाहीये असे नानांकडून कळल्यावर त्यांना फोन केला की त्यावेळी सुद्धा त्या इतक्या प्रसन्नपणे बोलतात की क्षणभर खरोखरीच या आजारी आहेत का? हा प्रश्न पडावा. 'देहे दुःख ते सुख मानित जावे' हे समर्थ वचन त्यांनी प्रत्यक्ष जगून दाखविले आहे. माईंवरची ईश्वरी कृपा सुद्धा खूप मोठी आहे.एक प्रसंग आठवतो. पाच सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हेमाताई अमरनाथला जायची होती. बरोबर माईंना न्यावे हा तिचा विचार होता. माईसुद्धा जाणार होत्या पण आयत्यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अमरनाथला जाते आले नाही. पण ज्या दिवशी माई तेथे पोचल्या असत्या नेमक्या त्याच दिवशी कवठ्याच्या घरातील फ्रिजमध्ये बर्फाचे शिवलिंग, अमरनाथांच्या रूपाने प्रकट झाले. अनेक लोकांनी त्याचे दर्शन घेतले आहे.
अशा आमच्या माई. त्यांच्याबद्दल किती सांगावे तेवढे थोडेच आहे. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते. नानांच्यासुद्धा सर्वार्थाने यशस्वी अशा आयुष्यामागे त्यांच्या गृहलक्ष्मीच्या रूपाने माईंचा मोठा वाटा आहे. त्यांना वंदन करताना म्हणावेसे वाटते,यादेवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थीत: | नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमोनमः ! नाना माईंबद्दल बोलताना नेहमीच कौतुकाने व अभिमानाने सांगतात की, बालपणापासूनच्या खडतर आयुष्यातील माझा दिलासा म्हणजे 'श्री' व माई.माझा एक हात श्रींनी धरला व एक हात माईंनी. या दोघांनीही मला सांभाळून माझ्या जीवनाचा प्रवास सुखकर केला.
बुवांच्या कीर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट होते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष होते. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प होता . या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली व श्रींनी सुरुवातीचा कालखंड जेथे व्यतीत केला ती राजीम, रायपुर तसेच अमरकंटक हि क्षेत्रे, बिलासपुर, नागपूर, कवठे गुलंद ते अक्कलकोट या बुवांच्या पायी वारीतील अनेक ठिकाणी व भारतभर सर्व प्रमुख पवित्र स्थानांवर बुवांनी संकल्प कीर्तने केली.